TOD Marathi

पुणे | नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई केली होती. तरीदेखील पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मतांनी सत्यजीत तांबे हे निवडून आले होते. या निवडणुकीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्यादरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही. या राजकीय घडामोडीदरम्यान सत्यजीत तांबे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशावर भाष्य केले आहे.

काँग्रेस पक्षात जाणार का असे विचारले असता तांबे म्हणाले की, काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला लक्ष्य करून बाहेर काढले. आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. मला पक्षातून काही लोकांनी बाहेर ढकलून दिले असले तरी आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे. पण अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही.

हेही वाचा ” …अजित दादांसाठी शरद पवारांकडून परतीचे दरवाजे बंद; कारण…”

निवडणुकीच्या काळात जो काही एपिसोड झाला तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, कशा पद्धतीने माझ्याबरोबर राजकारण झाले आणि कशा पद्धतीने पक्षातून बाहेर ढकलण्यात आले, मी काही एकटाच नाही, तर देशात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना नेत्याकडून ठरविक ठिकाणी टार्गेट करून ढकलण्यात येत आहे. ही चिंतेची बाब असून यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे असल्याची भूमिका मांडत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे संकेत दिले आहेत.